टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्रामध्ये राजकीय भूंकप झाला, अन् गेल्या १० दिवसांत राजकीय चित्र पालटले. त्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे मावळत्या सरकारमधील मंत्र्यांनी आपला कारभार आवरण्यास सुरूवात केली आहे.
‘भारतीय संविधानानुसार जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात, तेव्हा तो संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा’ समजला जातो. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर गुरूवारपासून सगळ्या मंत्र्यांनी आवाराआवार करायला सुरूवात केली.
जितेंद्र आव्हाड यांनीही आपले मंत्रीपद सोडले. आव्हाड यांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. त्यांच्या ‘अ-३’ या बंगल्यावर छोटेखानी निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी बंगल्यावरील व मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्याबद्दल आव्हाड यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.
कर्मचाऱ्यांशी माझे अडीच वर्षे संबंध आले. पण हे संबंध मंत्री व कर्मचाऱ्यांसारखे नव्हते. आमचे फार खेळीमेळीचे संबंध होते. मी रात्री उशिरापर्यंत काम करीत बसायचो तेव्हा मला ते गरम पाणी, गरम जेवण द्यायचे.
महाराष्ट्रातून कोणीही आला तरी त्या व्यक्तीला माझ्या बंगल्यावर जेवण दिले जायचे. पण माझे आचारी व जेवण वाढणारे यांनी कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे सुद्धा वाचा :
रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे
आपल्या पोरा-बाळांना उद्धव ठाकरेंचे शेवटचे भाषण दाखवा : संजय आवटे