अभय गोवेकर, टीम लय भारीचे अधिकृत क्रिकेट तज्ञ
“ लय भारी “ ने केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली. अखेर मुंबईच्या शिवाजीपार्क जिमखान्याच्या दीपक मुरकर, प्रविण आमरेच्या तालमीत तयार झालेल्या या सुपूत्राने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले (Mumbai Shivaji Park Gymkhana gave gift to the Indian team).
क्रिकेट कारकीर्दीतले “कभी तो हसाये कभी थे रुलाये” असे म्हणत चढ-उतार पाहिले तसेच अनुभवलेही. खरे पाहाता दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊन ठेपलेली होती. यावरही जिद्दीने मात करुन पुनरागमन केले. सामन्या आधी एक छोटेखानी समारंभ आयोजित केला जातो. अर्थात हे आम्ही इतर देशांच्या चालीरीती पाहून, शिकून त्यांचे आचरण करीत आहोत. ही आमची प्रथा नव्हती. या समारंभात श्रेयस अय्यरला विक्रमादित्य सुनील गावस्करच्या हस्ते मानाचा मुकुट चढविण्यात आला.
IND vs NZ : भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस
“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”
अर्थात भारताच्या मंडळाची ओळख असलेली टोपी मस्तकी धारण केली गेली. श्रध्दा-सबुरी का फल मीठा होता है / क्रिकेट नामक देवता आज त्याच्यावर संपूर्णत: प्रसन्न झालेली आहे. त्याची सत्यता किंवा प्रचिती म्हणजे त्याने यशस्वीरित्या पूर्ण केलेले शतक. खरे पाहता नव्वदी पासून शंभरी पर्यंतचा १० धावांचा प्रवास अत्यंत कठीण असतो, त्यात नावाजलेलेही गडगडतात.
मनाची एकाग्रता, शांत मस्तक व मानसिक दबाव योग्य रित्या हाताळला गेल्यास शंभरच काय एखादा विक्रमही त्याच्या हातून घडू शकतो. यात त्यास यश लाभले. यापुर्वीच्या त्याच्या प्रवासात २३ मार्च इंग्लंड विरुद्धच्या पुणे येथील सामन्यात त्याचा खांदा निखळला होता. यामुळे क्रिकेटपासून तो दूर होता. इंग्लंडमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. लॅंकशायर, कौंन्टी क्रिकेट – आय पी एल पुर्वार्ध त्याला चुकला. दिल्ली संघाचे नेतृत्व पंत कडे सोपवावे लागले.
क्रिकेट : छोडो कलकी बातें कलकी बात पुरानी ! (अभय गोवेकर)
”जो वादा किया है वो निभाना पडेगा” असे म्हणत फिटनेसवर लक्ष्य केंद्रित केले. आय पी एल उत्तरार्ध खेळण्यास मिळाला. भारताच्या टी २० संघात स्थान मिळाले. विश्वचषकासाठी मात्र त्याची निवड करण्यात आली नाही हेही त्याने स्वत:स सावरुन दुख: पचविले. माझा मित्र सहकारी दीपक मुरकरचे शब्द आठवले की, हा ‘लंबी रेस का घोडा है /’ नितीन दलालने काही काळापुर्वी त्याच्यावर पैज लावली होती. आज तोही जिंकला. या दोघांच्याही क्रिकेट दुरदृष्टी नजरेस सलाम.
कानपूर सुनील गावस्करचे सासरगांव तसेच त्याचे आवडीचे मैदान. श्रेयस अय्यरच्या बाबतीतले आजचे योगायोग पाहाण्याजोगे आहेत.
आरंभ २०१४ मध्ये मुंबई-युपी रणजी सामन्यात याच मैदानावर श्रेयसच्या ७५ धावा कामी आल्या होत्या. आज ७ वर्षांच्या कालावधीनंतर त्याचे कसोटी पदार्पण याच मैदानात होत आहे. संघाची कोणतीही, कशीही परिस्थिती असो दडपण तो यशस्वीरित्या हाताळतो. २०१७ मध्ये भारतीय संघात निवड झाली, परंतु संधीविना.
‘लय भारी’ने रहाणे-पुजाराच्या फॉर्मबद्दल त्यांच्याकडून फलंदाज म्हणून मोठ्या खेळीची अपेक्षा ठेऊन भाष्य केले होते. साशंकता खरी ठरली. पुजाराचे ८८ चेंडूत २ चौकारासहीत २६ धावा तर कर्णधार रहाणे एवढ्याच चेंडूत ६ चौकार सहित ३५ धावा यांच्या तुलनेत जाडेजास पाहा या अष्टपैलू खेळाडूने १०० चेंडूत ६ चौकारासहीत नाबाद ५० धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर सोबत नाबाद ११३ धावांची पाचव्या विकेट साठी भागीदारीही केलेली आहे. आज तरीही ४ बाद २५८ या सुस्थितीत भारतीय संघ आहे. संघातील मुख्य खेळाडू नसताना ही रचलेली धावसंख्या नक्कीच समाधानकारक आहे. उद्या प्रथम नवीन चेंडू नंतर खेळपट्टीची मिळणारी साथ यावर कोडे सोडवावे लागेल. सायंकाळी अपूरा सुर्यप्रकाश डोकेदुखी ठरु शकतो.
आजच्या खेळपट्टीचा विचार करता फलंदाजी करणे सोपे नव्हते. चेंडू अचानक उसळी घेत होते. तर कधी खाली फिरकी गोलंदाजांचे चेंडू भिंगरी सारखे फिरत होते. सकाळच्या सत्रात नवीन चेंडू स्वींग होत होता. जुना बऱ्यापैकी रिव्हर्स होत होता. न्युझीलंड संघाने आपले संघात घेतलेले तिन्ही फिरकी गोलंदाजांचा वापर केला. परंतु, यश लाभले नाही.
श्रेयस अय्यरची ही खेळी त्याचे दुसऱ्या कसोटीत स्थान नक्की करू शकेल का ? कसोटी मुंबईत आहे, विराट कोहली या कसोटीसाठी परत येत आहे या परिस्थितीत ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ असे म्हणनारी निवड समिती पुजारा-रहाणे यांना डच्चू देण्याचे धाडस करू शकतील ? त्यांना डच्चू देणार किंवा विचार केला जाणार. त्यांचे क्रिकेट मधील योगदान निवड समिती सदस्यापेक्षा नक्कीच मोठे आहे किंवा तुलनाही होणार नाही. परंतु मंडळास सोम्या-गोम्या दिड कसोटी वालाच हवा असतो. या विद्वानांची मंडळास एलर्जी आहे. दीड कसोटीवाला शंभर कसोटी क्रिकेट खेळलेल्याची निवड करणार… असे विनोदी प्रकार केवळ मंडळच करु शकते. सत्ता आणि पैशांसमोर क्रिकेट झुकते आणि झुकविले जाते. तुम्हा-आम्हाला ‘तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहावे’ हे म्हणण्याशिवाय दुसरा उपलब्ध पर्याय नाही. असे घातक निर्णय घेण्यात नेतेमंडळींचा सहभाग असतो. प्रदेश क्रिकेट असोसिएशनची अध्यक्ष सुची याची साक्ष देईल. पुढे येणाऱ्या दिवसात एकद्या पक्षाच्या कार्यालयातून भारतीय संघाची घोषणा झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.
शिवाजी पार्क जिमखान्याने भारतीय संघास देशास सुभाष, बाळू गुप्ते, अजित वाडेकर, रमाकांत देसाई, विजय मांजरेकर असे जगविख्यात खेळाडू भेट स्वरुपी दिले. यादीही फार मोठी आहे. आजच्या बऱ्याच काळानंतरचा शर्करामुक्त योग मात्र दादरकरांना अति सुखवाह आहे.
दादर शिवाजीपार्क मैदान क्रिकेटसाठी एवढे प्रसिद्ध आहे की, आज सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन बराच काळ लोटला तरी त्याने त्याच्या शालेय जीवनात या खेळाचा ‘श्रीगणेशा’ कोणत्या खेळपट्टीवर केला हे पाहण्यासाठी दूरदूरवरून अनेक लोक पार्कात येतात.
भारताच्या कसोटी क्रिकेटमधला फलंदाजीचा बादशहा कै.श्री.विजय मांजरेकरने जाहीर केले होते की, आपल्या निधनानंतर देहास अग्नी दिल्यानंतरची राहिलेली राख शिवाजीपार्क जिमखान्याच्या खेळपट्टी तसेच त्याच्या आजूबाजूस टाकण्यात यावी. या इच्छेस मान देऊन तशी कृतीही केली गेली. म्हणूनच की काय, आज त्याच मातीतून ‘श्रेयस अय्यर’ सारखा फलंदाज तयार होऊन देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. यापुढेही अनेक तयार होतील, यात शंकाच नाही. कारण या संस्थेस आमरे तसेच दिपक मुरकर सारखे निस्वार्थी पुजारी लाभलेले आहेत. हे क्रिकेटचे मंदिर नक्कीच जागृत अवस्थेत वावरेल व क्रिकेट नामक देवता सदासर्वदा पार्कावर प्रसन्न राहिल.
ऑस्ट्रेलियाचा जागतिक किर्तीचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमनचे नाव सर्वांनी ऐकलेले आहे. परंतु क्रिकेट संबंधित कोणताही विषय असो आपल्या अधिकार वाणीने कोणत्याही मंचावर प्रेक्षक वर्गासमोर स्वर-ताल व लय यांची सांगड घालून क्रिकेटच्या गाथा प्रस्तुत करतो. असा हा ब्रॅडमन आपल्यात आहे तो म्हणजे ‘व्दारकानाथ संझगिरी’ जो क्रिकेटचा फार मोठा भजक आहे, वारकरी आहे. ज्याच्या लेखणीने अनेकांना पार्क व्यक्तीरिक्तानांही महान होण्याचा मान मिळाला आहे. दुर्दैव हे व्यक्तिमत्व खेळ-खेळाडू-प्रशासक यांचे गुणगाण गाते. परंतु या शुद्धात्मा क्रिकेट संताचे कार्य लक्षात घेऊन त्याबद्दलचे दोन स्तुतीपर उद्गार कुणासही काढावेसे न वाटणे हा मी स्वत: अपराधच समजतो. ‘ अरे माझ्या नाथा ‘ तेरे प्यार का आसरा चाहता हू, वफा कर रहा हू, वफा चाहता हू/
क्रमश: