साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीत अंमळनेरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या मराठी साहित्य संमेलन स्थळासाठी अंमळनेरसह, सातारा, सांगलीतील औंदुंबर आणि जालना शहराची चर्चा होती. अखेर साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर शहराला साहित्य संमेलन भरविण्याचा मान मिळाला.
साहित्य महामंडळातर्फे संमेलन स्थळ निश्चित करण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीमध्ये साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांचा समावेश होता. या समितीने संमेलन स्थळाचे नाव निश्चित करण्यासाठी औंदुंबर आणि अंमळनेर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर समितीने सर्व सहमतीने अंमळनेर येथील मराठी वाङ्ममय मंडळाची संमेलनासाठी निवड केली. साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे सुध्दा वाचा :
पाकिस्तान ही सांगेल शिवसेना कोणाची, पण निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला : उद्धव ठाकरे
‘टेलिग्राम’वर बंदी घाला, मराठी चित्रपट दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची मागणी
रक्तातील नात्यांच्या गळाभेटीमुळे कैद्यांच्याही अश्रूंचा फुटला बांध..!
साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंमळनेरमध्ये दुसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. यापूर्वी १९५२ मध्ये कृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अंमळनेर येथे साहित्य संमेलन पार पडले होते. जळगाव जिल्ह्याला दुसऱ्यांदा साहित्य संमेलन घेण्याचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये शंकर रामचंद्र खरात यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरात साहित्य संमेलन झाले होते.