टीम लय भारी
औरंगाबाद : माझे वय ८० वर्षे आहे, पण ते ८५ वर्षे असल्यासारखे तुम्ही मला प्रश्न विचारता, अशी मिश्कील प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली, अन् जोरदार हंशा पिकला ( Sharad Pawar says, he is 80 yrs old).
तुमचे वय जास्त असूनही तुम्ही राज्यभर फिरत आहात. तुमच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो अशा आशयाचा सवाल पत्रकारांनी पवार यांना विचारला. त्यावर पवारांनी मिश्कील प्रतिक्रिया व्यक्त केली.
नरेंद्र मोदी सरकारविषयी पवार यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली ( Sharad Pawar upset on Narendra Modi government ). ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मदत जाहीर केली. पण ती अजून राज्याला मिळालेली नाही. त्यामुळे उद्योगधंदे कसे सुरू करायचे याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. आरोग्यप्रमाणेच राज्याचा आर्थिक प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी आम्ही उद्योग क्षेत्र पुनर्जिवीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोरोना’ची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सद्यस्थिती, उपाययोजना इत्यादींबाबतचा आढावा घेण्यात आला. कोरोनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकत्रित येऊन लढलो तर, कोरोना संकटावर नक्कीच मात करता येईल, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
हे सुद्धा वाचा
उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांचे राम मंदीराबातचे वक्तव्य योग्यच
Corona : शरद पवारांचे नरेंद्र मोदींना आणखी एक पत्र, शेती संकटात असल्याकडे वेधले लक्ष
देशभरात पाच ते सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.
खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नसल्याबाबत पवार म्हणाले की, जिल्हा यंत्रणेच्या हाती आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे. त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स बजावण्याचा विचार करावा.
मालेगाव आणि धारावीतील जनतेप्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील जनता कोरोना संकटावर मात करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
‘कोरोना’ काळात प्रत्येकजण सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून समाजासाठी एक उत्तम उदाहरण दिल्याचे ते म्हणाले.
‘कोरोना’बाधितांचा दुपटीचा दर हा १४ दिवसांवरून ३० दिवसांवर गेला आहे, ही खूप मोठी गोष्ट असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. औरंगाबादमधील परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांचे मोठे योगदान असेल. स्थानिक प्रशासनाला त्यांचे नक्कीच सहकार्य मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरीनेच खुद्द मुख्यमंत्रीही जातीने आणि जबाबदारीने लक्ष घालून विविध उपाययोजना करण्यासाठी कष्ट घेत आहेत. त्यांना जनतेचेही सहकार्य मिळत असून सरकारच्या सूचनांचे जनतेकडूनही काटेकोरपणे पालन होत आहे.
यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आणि औरंगाबाद जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.