आर्थिक लाभासाठी कोण काय करेल याचा नेम नाही, याचेच एक चपखळ उदाहरण आता समोर आले आहे. उसाच्या फडात चक्क गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणांपासून अनेकांना व्यसनेच्या आहारी पाठवणारी ही गांजा शेती आता राजरोसणे शेतकरी करू लागल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे, शिवाय या शेती उत्पादनामागे संघटीत शक्तीच काम करत असल्याने याची दखल उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस घेणार आहेत की नाही असा सवालच अनेकांकडून आता विचारण्यात येत आहे. दरवेळी कोणत्याही शेती उत्पादनात नुकसानीचा फटका बसत असल्याने शेतकरी आर्थिक फायद्यासाठी गांजाच्या शेतीकडे वळत असल्याने राज्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, गांजा पिकवल्याची कुणकुण राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागली आणि या माहितीच्या आधारे मिरजपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असणारे शिपूर या गावाच्या हद्दीत गांजा लागवड केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याआधी जिल्ह्याच्या ठिकाणाहून 100 किलोमीटर अंतरावरील जत तालुक्यात सुद्धा गांजा शेती करत असल्याचे उघडकीस आली होती आणि त्यावर पोलिसांनी कारवाई करीत लाखो रुपयांचा गांजा जप्त सुद्धा केला होता.
दरम्यान शिपूर येथील गांजा प्रकरण जत पेक्षाही मोठे असून येथे छुप्या पद्धतीने पीक घेतले जात असल्याचे समोर आले आहे. कारण येथे जाणीवपूर्वक शेती करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर गांजा पीक उसाच्या शेतातच घेण्यात आले आहे. येथे झाडांच्या पानांची तोडणी वरचेवर केल्यामुळे त्याचे खोड मोठे दिसायला लागले आणि त्यामुळेत येथे गांजा असावा असा संशय बळावला आणि कारवाई करण्यात आली. तब्बल पाऊण एकर उसामध्ये असलेल्या गांजाचे झाडे कटरच्या साहाय्याने कापण्यात आली असून गांजाचे बंधे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रक्रियेनंतर झाडांचे वय लक्षात येणार आहे.
हे सुद्धा वाचा…
Eknath Shinde : एकनाथ शिंदे सत्तेत आले अन् राज्याचे 3 हजार कोटींचे नुकसान झाले !
Arvind Kejriwal : …तर गुजरातमध्ये ‘आप’ची सत्ता येणार, केजरीवाल यांचा दावा
गांजाच्या शेतीची प्रकरणे वारंवार समोर येऊ लागल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. भारत कृषी प्रधान देश असला तरीही बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोणतेही उत्पन्न घेतले तरी त्याच्या उत्पादनापासून, दरवाढ, मालाला ग्राहकच न मिळणे, उत्पादन खर्चाशी निगडित दर न मिळणे, औषध, मेहनत, मजुरीचा वाढता खर्च या सगळ्याच बाबतीत त्याला फटका बसतो, त्यामुळे शेतीतून आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी गांजाच्या शेतीकडे वळू लागले आहेत.
गांजा ही अशी वनस्पती आहे ती दिसायला झेंडू सारखी असते, परंतु नशा करण्यासाठी तो स्वस्त पर्याय म्हणून पाहिला जातो. सांगली, मिरज शहरात सध्या तरुणांमध्ये गांजाचे प्रमाणे वाढत असल्याने काहींनी याची शेतीच करायला घेतली आहे. मिरज मध्ये तर स्थानकांपासून अनेक ठिकाणी अगदी सहजपणे दोन-चार ग्रॅमची गांजापूड मिळत असल्याने नशेखोरांचे चांगलेच फावले आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागालाच टपली मारून असे धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. हतबल झालेले शेतकरी असे प्रयोग करत आहेत की कोणी समाजकंठक शेतकऱ्यांना हाताशी धरून ही गांजाची शेती फुलवत आहे हे सुद्धा पाहणे आता या निमित्ताने पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.