आशिया कप स्पर्धेच्या ‘अंतिम चार’ गटाच्या फेरीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघाची स्पर्धेत दुसऱ्यांदा लढत झाली. रविवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने भारताने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना ५ गडी राखून आणि एक चेंडू राखून विजय संपादन केला. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये नेहमीच अटीतटीची लढत होते. काल झालेला सामना हा सुद्धा त्याला अपवाद नव्हता. अगदी शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोणता संघ जिंकेल याची क्रिकेट रसिकांना कल्पना नव्हती.
भारताच्या तरूण वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा संघ फंलदाजी करत असताना रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात एक सोपा झेल सोडल्याने पाकिस्तानी फंलदाज आसिफ अलीला जीवनदान मिळाले. त्याने पाकिस्तानच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली. भारताचा हा पराभव भारतीय क्रिकेट रसिकांच्या जिव्हारी लागला त्यामुळे चाहते सिंहची सोशल मिडीयावर खूप टीका करताना पहायला मिळत आहे.
पंरतु भारताचा पूर्व कर्णधार आणि तारांकित खेळाडू विराट कोहली त्याच्या बचावासाठी धावून आला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदमध्ये कोहली अर्शदीप सिंहची पाठराखण करत म्हणाला की, अशाप्रकारच्या महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या लढतीत कोणत्याही खेळाडूकडून चुका होऊ शकतात परंतु त्या चुकांमधून शिकून पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये लक्ष क्रेंदीत करणे महत्त्वाचे आहे. आमच्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये अगदी छान वातावरण आहे आणि त्याचे श्रेय मी संघाच्या कर्णधाराला व प्रशिक्षकांना देईन.
कोहली पुढे असे म्हणाला की, माझ्या करियरच्या सुरूवातीला मी सुद्धा अनेक चुका केल्या आहेत. तेव्हा मी खूप निराश व्हायचो. पण अशा गोष्टी कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत होणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे.
हे सुद्धा वाचा –
Amit Shah : अमित शाहांनी देवेंद्र फडणविसांना दाखविली ‘जागा’ !
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना झापले
Marathi people : ‘मराठी माणसांना गाडा, अनं मॉल उभे करा’
सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला फंलदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचे सलामवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी तुफान फटकेबाजी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. परंतु धावसंख्येची गती वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दोघेही बाद झाले. दोघांनी प्रत्येकी २८ धावांची खेळी केली. नंतर विराट कोहलीने भारतीय डावाला सावरत ४४ चेंडूमध्ये ६० धावांची खेळी केली त्यामुळे भारताला २० षटकांमध्ये १८१ धावा करणे शक्य झाले.
दुसऱ्या डावात फंलदाजी करताना पाकिस्तानच्या संघातर्फे त्यांच्या यष्टीरक्षक-फंलदाज मोहम्म्द रिझवानने ५२ चेंडूत सर्वाधिक ७१ धावा केल्या. परंतु पाकिस्तानचा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने २० चेंडूत केलेल्या ४२ धावांच्या जलद व उपयुक्त खेळीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. त्या जोरावर अंतिम षटकात पाकिस्तानने विजय मिळवला.
भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंडया, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल व अर्शदीप सिंहने प्रत्येकी एक बळी मिळवला.
पाकिस्तानशी झालेल्या पराभवानंतर भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंका व अफगाणिस्तान संघाशी होणाऱ्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारतीय संघाची मंगळवारी श्रीलंकेशी आणि गुरूवारी अफगाणिस्तानशी लढत होणार आहे.
आमचे युटयूब चॅनेल सुद्धा सबस्क्राइब करा –