भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भावना असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे खेळात आणि खेळाच्या नियोजनात झालेल्या चुकांवर देखील अनेकदा चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत असते. विशेष म्हणजे अनेकदा या चर्चांमध्ये माजी खेळाडू सहभागी होतात आणि नवनविन धक्कादायक खुलासे होत असतात. असाच एक महत्त्वाचा आणि खळबळजनक खुलासा केल्याने आता पुन्हा एकदा भारताचा माजी फिरकीपटू चर्चेत आला आहे. भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावणारा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने एख पत्र लिहित धक्कादायक खुलासा केला आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार हरभजन सिंग यानी शुक्रवारी (7 ऑक्टोबर) एक पत्र लिहिले, त्यानंतर खळबळ उडाली आहे. हरभजन सिंगने या पत्रात पंजाब क्रिकेट असोसिएशनचे काही अधिकारी ‘बेकायदेशीर कामात’ गुंतले असल्याचा आरोप केला आहे. हरभजनने पत्रात त्या पदाधिकाऱ्यांचे नाव घेतलेले नाही. हे पत्र पीसीए सदस्य आणि युनियनच्या जिल्हा घटकांना पाठवण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
Eknath Shinde: एसटीचे ‘ते’ ११७ कर्मचारी ‘पुन्हा येणार’; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनीही मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की PCA ला 150 सदस्यांना फ्रँचायझीमध्ये समाविष्ट करायचे आहे जेणेकरून त्यांचा वरचा हात असेल. हे सर्व मुख्य सल्लागारांशी सल्लामसलत न करता किंवा सर्वोच्च परिषदेला न विचारता केले जात आहे. हे बीसीसीआयच्या घटनेच्या, पीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे आणि क्रीडा युनिट्सच्या पारदर्शकतेच्या नियमांचेही उल्लंघन आहे.”
तो यावेळी म्हणाला की, “त्यांची बेकायदेशीर कृती लपवण्यासाठी ते पीसीएच्या औपचारिक बैठका घेत नाहीत आणि सर्व निर्णय स्वतः घेत आहेत.” पत्राबद्दल विचारले असता, हरभजनने पीटीआयला सांगितले की, “तक्रारी येत आहेत. मला मुख्य सल्लागार बनवण्यात आले आहे पण मला बहुतांश धोरणात्मक निर्णयांची माहिती दिली जात नाही. दुसरा पर्याय नसल्याने मला सदस्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहावी लागली.”
दरम्यान, हरभजन सिंग याने लिहिलेल्या या पत्रामुळे पुन्हा एकदा हाहाकार उडाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मोहालीमधील आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियम येथे भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याच्यासह हरभजनसिंग याच्या नावाचे एक स्टँड तयार करण्यात आले होते. त्यामुळे अनेक काळ हरभजन सिंग चर्चेत राहिला होता.