भारतीय क्रिकेट संघाच्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धेमध्ये शुक्रवारी एक जबर धक्का बसला आहे. सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मालिकेच्या उर्वरित सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. बीबीसीआयचे वैदयकीय पथक सध्या त्याच्या दुखापतीवर उपचार करत आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेलचा (Axar Patel) संघात समावेश केला आहे. बीबीसीआयने दिलेल्या माहितीनुसार अक्षर पटेल लवकरच दुबईमध्ये संघात सामिल होणार आहे.भारतीय संघाने पाकिस्तानला नमवून त्याच्या आशिया कप अभियानाला सकारात्मक सुरूवात केली. भारताच्या त्या विजयामध्ये रवींद्र जाडेजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पाकिस्तान विरूद्धच्या लढतीत जडेजाने ३५ धावाची खेळी केली. हार्दिक पंडया आणि रवींद्र जाडेजा यांच्या अफलातून खेळीमुळे भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळविला.
हे सुद्धा वाचा
Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
भारताच्या दुसऱ्या साखळी सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नाबाद ६८ धावांच्या आणि विराट कोहलीच्या नाबाद ५९ धावांच्या झंझावाती खेळीमुळे हाँगकाँग विरूद्धच्या सहज विजय संपादन केला. भारताने ‘अ’ गटातून आणि ‘ब’ गटातून श्रीलंका आणि अफगाणिस्तानने अंतिम चार संघाने आपले स्थान निश्चित केले आहे.
पाकिस्तानच्या संघाची आज हाँगकाँगशी संघाशी लढत आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्याला स्पर्धेच्या अंतिम चार संघामध्ये प्रवेश मिळेल. आशिया कपच्या अंतिम चार संघाच्या साखळी सामन्यांची सुरूवात शनिवार ३ सप्टेंबरपासून होईल आणि अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.
आशिया कपच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतीय चमू – रोहित शर्मा (कर्णधार), के.एल.राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (उप-कर्णधार), दिनेश कार्तिक (उप-कर्णधार), हार्दिक पंडया, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंह.