राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाचा प्रत्येकच दिवस वेगवेगळ्या घडामोडींमुळे वादळी ठरत आहे. आजचा अधिवेशनाचा सहावा दिवस असून आज सुद्धा वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत आहे. यावेळी भाई जगताप यांनी सुद्धा सभागृहात सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले असून पन्नास खोक्यांचा मुद्दा पुन्हा लावून धरला. ताकदवान शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून बोलताना ‘कसली ताकद.. पन्नास खोके.. सबकूछ ओके’ असा मिश्किल टोला सुद्धा जगताप यांनी यावेळी लगावला आहे. जेव्हापासून एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हात मिळवणी केली, सत्तेसाठी भ्रमंती केली त्यानंतरच पन्नास खोक्यांचा मुद्दा गाजू लागला आहे.
सभागृहात सत्ताधाऱ्यांना प्रश्न करत भाई जगताप यावेळी म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या आम्ही गोष्टी करतो परंतु ज्या पद्धतीने जे चाललंय त्यासाठी शब्द नाहीत. यांना असं वाटतं की ते फक्त आणि फक्त सरकार म्हणजे कोण तरी खूप ताकदवान. पण कसली ताकद.. पन्नास खोके..सबकूछ ओके..ही ताकद.. असे म्हणून जपताप यांनी शिंदे – फडणवीस सरकारला सुनावले आहे. भाई जगताप पुढे म्हणाले, ही ताकद सगळ्यांनी बघितली आहे, या देशातल्या सगळ्या जनतेने बघितली आहे. त्यामुळे जनता यावर जेव्हा जो निर्णय घ्यायचा आहे तो घेईलच असे म्हणून त्यांनी यावेळी सूचक वक्तव्य करीत नव्या सरकारला इशाराच दिला आहे.
हे सुद्धा वाचा…
Maharashtra Assembly Session : बॅनर झळकावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे आदित्य ठाकरेंनी काढले संस्कार
Bus Accident : दापोलीत दोन बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात
Internet :ऑक्टोबरमध्ये ‘5 जी’ इंटरनेट सेवा सुरु होऊ शकते
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पन्नास खोक्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ‘पन्नास खोके सगळं ओके’चे बॅनर घेऊन विरोधक बऱ्याच वेळेस सभागृहांच्या पायऱ्यांवर दिसून आले आहेत. सभागृहात सुद्धा हाच मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येत असून वाद आणखी चिघळू लागला आहे त्यामुळे हा पन्नास खोक्यांचा मुद्दा निकालात लागणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान आज शिंदे गटातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज’ अशा आशयाखाली व्यंगचित्र असलेला बॅनर झळकावत शिवसेनेला मुद्दामून डिवचले परंतु त्यावेळी आदित्य ठाकरेंनी सुद्धा मला पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आहे, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. अधिवेशनात यावेळी विरोधक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसल्याने राज्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत त्यांचा मवाळ सूर ऐकायला मिळत आहे, तर विरोधक त्यांना फैलावर घेत भंडावून सोडत असल्याचे चित्र दिसत आहे.