टीम लय भारी
मुंबई : दोन दिवसांपूर्वी शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत विधानपरिषदेच्या रिक्त होत असलेल्या 12 जागा भरण्याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
या 12 जागा येत्या 6 जून रोजी रिक्त होत आहेत. या जागा राज्यपाल कोट्यातील आहेत. परंतु या जागा भरायच्याच नाहीत अशा मानसिकतेमध्ये राज्यपाल आहेत. त्यामुळे या जागा भरण्याबाबत शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राज्यपालांनी विनंती केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतीय राज्य घटनेतील कलम 171 (5-ड-ख) नुसार या जागांवर साहित्य, विज्ञान, कला, सहकार आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात नेत्रदीपक काम केलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पण गेली कित्येक वर्ष ही तरतूद धाब्यावर बसविली आहे. त्या ऐवजी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची या जागेवर नियुक्ती केली जाते.
विद्यमान राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे मुळातच आडमुठे आहेत. राज्य सरकारला ते सतत अडचणीत आणण्याच्या उद्योगामध्ये व्यस्त असतात.
स्वतः नियमांचे पालन करीत नाहीत. पण सरकारला नियम दाखवत बसतात. त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या या 12 जागांबाबत महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची आयतीच संधी राज्यपालांना मिळाली आहे. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीकडे बोट दाखवून ते राजकीय नियुक्त्या करणे टाळतील अशी शक्यता व्यक्त होत होती.
राज्यपालांनी मात्र या जागांवरील नियुक्त्या एवढ्यात करायच्याच नाहीत, अशी भूमिका घेतली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘कोरोना’ आपत्तीच्या नावाखाली या जागांवरील नियुक्त्या लांबणीवर टाकण्याचा राज्यपालांचा विचार आहे.
शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी मात्र या जागा भराव्यात यासाठी राज्यपालांकडे आग्रह धरल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 12 आमदारांसाठी लवकरच निवड प्रक्रिया, पण राज्यपालांच्या कोलदांड्याचे सावट
Balasaheb Thorat : ‘भाजपच्या असंतुष्टांना सत्तेची लालसा, म्हणून धडपड’