टीम लय भारी
औरंगाबाद : एक महिना होत आला तरी, शिवसेनेमधील फोडाफोडीच्या राजकारणाला अद्यापही पूर्णविराम लागलेला नाही. हातांच्या बोटावर मोजण्याइतके जुने चेहरे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आहेत. पण ते देखील कधीही शिंदे गटात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेला आणखी भगदाड पडू नये यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून शपथ पत्र लिहून घेतले आहे.
पण आता या शपथ पत्राचा देखील शिवसैनिकांवर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. कारण शपथ पत्र लिहिलेल्या औरंगाबादेतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे या शपथ पत्रात लिहून दिले होते. परंतु आता हेच शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत.
औरंगाबादचे पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला शपथ पत्र लिहून दिले होते. पण आता आम्ही स्थानिक नेतृत्वावर नाराज असलयाचे कारण देत त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आता औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोनच चेहरे उरले आहेत. तर उर्वरीत सर्वच औरंगाबादमधील शिवसेनेचे प्रभावी नेते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला याठिकाणी खूप मोठे खिंडार पडले आहे. आणि म्हणूनच आता आगामी मनपा निवडणुकीकरिता उद्धव ठाकरे यांना औरंगाबादमध्ये काळजीपूर्वक मतदार बांधणी करावी लागणार आहे.
हे सुद्धा वाचा :
’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम
किरीट सोमय्यांना शिवसेनेतील माहिती पुरवणारा ‘खबरी’ कोण ?
शिवसेनेच्या तालुका प्रमुखाने उद्धव ठाकरे यांना रक्ताने लिहिले पत्र