एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या विस्तारीत मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या तुलनेत दुप्पट मदतनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. मुंबईतील ‘मेट्रो ३’च्या वाढीव खर्चालाही आजच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. १० हजार कोटी रूपये वाढिव खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण खर्च २३ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांना सांगितले.
शेतकरी व मुंबईकरांसाठी दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिंदे व फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.
शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे १५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदतनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषांनुसार ६ हजार ८०० रूपये प्रती हेक्टरी मदत केली जाते. ती आता १३ हजार ६०० रुपये होईल. शिवाय पूर्वी दोन हेक्टरांपर्यंत मदत केली जात होती. ती मर्यादा आता तीन हेक्टरांपर्यंत वाढविल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या ‘ठळक’ बाबी !
Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना
‘मेट्रो ३’च्या निर्णयाबद्द्ल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सन २०१५ साली ‘मेट्रो ३’चा पहिल्यांदा निर्णय झाला तेव्हा २३ हजार कोटी रूपये या प्रकल्पाची किंमत होती. पण आता त्यात १० हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार एकूण ३३ कोटी रुपयांच्या खर्चाला आजच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
‘मेट्रो ३’चे ८५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु कार डेपोचे काम २९ टक्के एवढेच झाले आहे. ते पूर्ण करून २०२३ साली ‘मेट्रो ३’ धावली पाहीजे, असे फडणवीस म्हणाले.
वाढलेल्या खर्चापैकी केंद्र सरकार ५० टक्के रक्कम देणार आहे. उरलेली ५० टक्के रक्कम बँका देणार आहेत. या प्रकल्पामुळे रस्त्यावरील १० लाख वाहने कमी होतील, तसेच दररोज १७ लाख लोकं प्रवास करतील. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.