राज्यात परतीच्या पावसामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले, तसेच कीड, रोग यामुळे देखील पिकांचे यंदा आतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना हक्काचा २०२० चा पीक विमा मिळावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेझ) आमदार कैलास पाटील गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. आमदार कैलस पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रविवार (३० ऑक्टोबर) रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत.
सकाळी ८.३० वाजता आमदार कैलास पाटील यांची आमरण उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भेट घेऊन चर्चा करतील. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय रक्कम मिळणेाबाबत सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (धाराशीव) येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा करून शेतकऱ्यांच्या पीक विमा दिरंगाई बाबत जाब विचारणार आहेत.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, पीक विम्याचे पैसे मिळावेत य़ासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून राज्यभरात पिक नुकसानीचे पाहणी दौरे सुरू आहेत, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देखील देत आहेत. नुकताच उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दौरा काढून शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील नाशिक, पुणे जिल्ह्यात दौरा काढत शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
हे सुद्धा वाचा :
वसूलीपायी प्रकल्प घालवले; उद्धव ठाकरेंवर शितल म्हात्रे यांचा आरोप
खोक्यांचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून झाल्याचे दिसते; एकनाथ खडसे यांचा आरोप
तर आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले आहे. मात्र प्रशासन अथवा सरकारकडून अद्याप देखील त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. दरम्यान आमदार कैलास पाटील यांना पाठींबा देण्यासाठी तसेच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे उद्या उस्मानाबाद दौऱ्यावर जाणार आहेत.