महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे (University)तसेच अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी उच्च शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. या परिषदेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माइक हँकी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि अमेरिकेच्या विविध विद्यापीठांचे प्रमुख तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु आणि कुलसचिव उपस्थित होते.
या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवन निर्माण करणारे आणि चरित्र संपन्न व्यक्तीमत्व निर्माण करणारे असावे. उच्च शिक्षणासाठी भारत आणि अमेरिकेमध्ये विचार मंथन होणे आवश्यक असल्याचेही राज्यपाल यावेळी म्हणाले. या धोरणामुळे भारत अमेरिका या दोन देशांमध्ये ज्ञानाची आदान प्रदान होईल.
हे सुद्धा वाचा
Raju Shetti : राजू शेट्टी यांनी दंड थोपटले
Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची घेणार शाळा !
BJP : राष्ट्रवादीचे भाजपला 30 सवाल
भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. ही अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. भारत आणि अमेरिकेमध्ये अनेक बाबींमध्ये साम्य आहे. देशाच्या विकासात मुंबईचा मोठा हातभार आहे. भारताला ज्ञान महासत्ता बनवणे ही नवीन शैक्षणिक धोरणाची भूमीका आहे. त्यासाठी या नवीन धोरणांनुसार बदल करुन नवी शाखांची निर्मीती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी अधिक सक्षम बनतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
उच्च शिक्षणात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. आजच्या बैठकीतील मुद्यांवर चर्चा होईल. त्यातून राज्याचे धोरण ठरविण्यात येईल. महाराष्ट्र आणि अमेरिकेची विद्यापीठे एकत्र आली तर शैक्षणिक प्रगती नक्कीच होईल. महाराष्ट्रातून दरवर्षी एक लाख विद्यार्थी परदेशातील विविध विद्यापीठात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. स्टार्ट अप इंडिया गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी अनेक चांगली उत्पादने तयार केली आहेत. या परिषदेमध्ये द्विपदवी अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रिया, संशोधन, अभ्यासक्रम, भाषांतर, चर्चासत्र, शैक्षणिक परिषदा यांच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.