राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धुमधाम पाहायला मिळत आहे. सगळीकडेच दांडगा उत्साह पाहायला मिळत असला तरीही काही ठिकाणी मात्र कोणाचा उत्साहच मावळलेला पाहायला मिळत आहे. नागपूर येथे असेच काहीसे घडले असून चक्क लहानग्यांना सणासुदीच्या काळात त्रास सहन करावा लागत आहे. शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गरब्यासाठी मंच बांधण्यात आलेला आहे. प्रवेश करण्याच्या मार्गिकेतच कार्यक्रमाच्या आयोजकांनी मंच बांधण्याचा आचरटपणा केल्याने लहानग्यांची चांगलीच फजिती होत आहे. सदर प्रकार नागपूर महापालिकेच्या रामदासपेठेतील शाळेत घडला असून शाळेच्या इमारतीचा मार्गच बंद करून टाकल्याने विद्यार्थ्यांना एका चिंचोळ्या मार्गाने ये – जा करावी लागत आहे, त्यामुळे या प्रकरणाची दखल कोण, कधी घेणार असा सवालच करण्यात येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रामदासपेठ भागातील मोर हिंदी उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात रामदासपेठ प्लॉट ओनर्स असोसिएशन यांच्यातर्फे (रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन) गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा सुद्धा या उत्सवाचे निमित्त साधत शाळेच्या आवारात त्यांनी गरब्यासाठी मंच बांधला. कार्यक्रमाच्या आयोजकांनी संपुर्ण शाळेच्या आवारातच गरब्यासाठी मोठा मंडप टाकला असून शाळेचे प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यासाठी सुद्धा त्यांनी जागा सोडलेली नाही. केवळ गरब्यासाठी येणाऱ्यांचा विचार करून ज्या शाळेत मंडप उभारला त्या शाळकरी मुलांची मात्र वाट पुर्णपणे बंद करून टाकली, त्यांचा यावेळी कोणताच विचार करण्यात आला नाही.
हे सुद्धा वाचा…
Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाहिजे – नितीन गडकरी
Katrina Kaif : कतरिना कैफसोबतच्या नव्या सिनेमाबाबत अली जफरने दिली खास अपडेट
World Health Day : हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा
परिणामी मुलांना एका चिंचोळ्या मार्गाने शाळेसाठी येजा करावी लागत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त कहर म्हणजे या लहानशा रस्त्यावरही वायर इकडे तिकडे पाहायला मिळत आहेत, त्यामुळे केवळ तेवढ्याच भागांतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उद्भवू लागला आहे. त्याच परिसरात बास्केटबॉलचे सिमेंट कोर्ट आहे, जिथे सगळीकडे केवळ मातीचे ठिगारेच दिसून येत आहेत, त्यामुळे बास्केटबॉलच्या बास्केट्स आणि बास्केट कोर्टचे सुद्धा नुकसान झाल्याचे सूर उमटत आहे, शिवाय मंडपाला लागणारे इतर सामान सुद्धा अस्ताव्यस्थपणे पसरून ठेवल्याने शाळेला सुद्धा त्रास होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या एका मंडपामुळे होणाऱ्या या त्रासामुळे शाळेच्या परिसरात उभारलेल्या या मंडपाच्या आयोजकांंना जाब विचारण्यात यावा अशी मागणीच आता जोर धरू लागली आहे. या शाळेच्या शंभर मीटरच्या आवारात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ ग्रंथालय अशा संस्था आहेत, रहिवासी वस्ती सुद्धा लागूनच आहे त्यामुळे रामदासपेठेतील शाळेच्या मैदानावर गरबासाठी मंडप टाकण्यावरून नागरिकांनी याआधी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात पुढाकार घेत महापालिका आयुक्तांकडे सुद्धा नागरिकांनी तक्रार केली होती परंतु त्याकडे प्रशासनाकडून सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.
त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात शाळेच्या गेटला कुलूप लावणाऱ्या आयोजकांच्या विरोधात काही कारवाई होणार का, संंबंधीत प्रकरणाची चौकशी करणार का हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.