टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात दिवसेंदिस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल अर्थात बुधवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १० हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई तसे उपनगरीय प्रवास सोपा आणि सोयिस्कर करणाऱ्या लोकलवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसा विचार राज्य सरकार करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
कोरोना वाढतोय, लोकलवर लवकरच निर्णय
“राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. येथे काल एका दिवसात तब्बल १०,४२८ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर काल दिवसभरात येथे ६००७ जणांनी डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या ८०८८६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज पुन्हा या रुग्णांमध्ये भर पडली असेल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८० टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांवर आला आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवारा यांनी लोकल बंद किंवा नवे निर्बंध लागू करण्याबद्दल वरील सूचक वक्तव्य केल्यामुळे आता चाकरमाण्यांच्या प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. तसेच लोकलवर नव्याने निर्बंध लागू केले तर ते कोणते असतील याबद्दलसुद्धा अनेक तर्क लावले जात आहेत.