टीम लय भारी
मुंबई : राज्य सरकारच्या अनेक खात्यांनी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवलेल्या आहेत. ही रक्कम 1 लाख कोटीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. हा निधी राज्यभरातील गोरगरीबांना द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी केली आहे.
‘लय भारी’शी बोलताना ते ( Gopichand Padalkar ) म्हणाले की, ‘लॉकडाऊन’मुळे राज्यभरातील गरीब जनतेचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. अगोदरच बेताची परिस्थिती असलेल्या या सामान्य लोकांची ‘लॉकडाऊन’मुळे उपासमार होत आहे.
सामान्य लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा सरकारने लक्षात घ्यायला हव्यात. राज्यभरातील तालुका, जिल्हा स्तरापासून ते मुंबई – पुण्यासारख्या महागनगरांतील अनेक सरकारी कार्यालयांनी बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. लोकांच्या मृत्यूची वाट पाहण्यापेक्षा या ठेवी मोडून त्या लोकांसाठी खर्च कराव्यात.
मुंबई महापालिकेच्या जशा 63 लाख रुपयांच्या ठेवी आहेत, तशा ठेवी सरकारच्या विविध खात्यांच्या आहेत. यांत एमएमआरडीएसारखी प्राधिकरणे व कार्यालयांचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले.
ठेवींच्या माध्यमातून अडचणीच्या काळात सरकारकडे मोठा निधी प्राप्त होणार आहे. त्याचा निनियोग गोरगरीब लोकांसाठीच व्हायला हवा. हे सामान्य लोक कपडे, मीठ, तेल खरेदी करतात. त्यातून सरकारला कर मिळतो. हीच सामान्य जनता आता संकटात सापडली आहे.
या सामान्य जनतेला घर चालविण्यासाठी रोख रक्कम द्या, किंवा जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा पुरवठा करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा
IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून ‘कोरोना’च्या लढाईत आघाडी
BREAKING : ‘कोरोना’ग्रस्त मंत्र्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता, सचिव सुद्धा झाले ‘कॉरन्टाईन’